कोरोना.. कठीण...पण शांततेचा काळ......
गेले तीन महिने आपण सर्वजण कठीण काळात जगत आहोत. पण हा काळ कठीण असला तरी अनेकांसाठी तो शांततेचा आहे. या तीन महिन्यांत देशातील अनेक गोष्टी बंद होत्या. त्याचा परिणाम आपल्याला पुढील काही वर्षामध्ये दिसणार आहे. पण आपण या तीन महिन्यातील शांततेच्या काळात काय केले याचेही अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. शांततेच्या काळात आपण जे कार्य केलेले आहे ते नजीकच्या काळात आपल्याला उपयोगी पडणार आहे.
मालवण येथील संग्राहक उदय रोगे यांनी कोरोना साथ रोगाच्या कालावधीत माफक किमतीतील मास्कची निर्मिती केली. त्याच्या या उपक्रमाला अनेक स्वयंसेवी संस्थांचा प्रतिसाद मिळाला. पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी नारळाच्या करवंट्या तसेच बांबू पासून अनेक सुंदर वस्तू बनवल्या. सिद्धेशने सोशल मिडीयाच्या माध्यमातून या वस्तू अनेकांपर्यंत पोहचवल्या. काही जणांनी ह्या वस्तू रोजगाराचे साधन असल्याचे सांगितले. भरतगड इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे खोत यांनी घरच्या घरी अनेक शैक्षणिक वस्तू बनवल्या आहेत. या शैक्षणिक वस्तूंचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
मालवण तालुका सानेगुरुजी कथामालेतर्फे व्हाँट्स अप ग्रुपद्वारे कथा सांगू आनंदे हा उपक्रम राबविण्यात आला. टोपीवाला काँलेजर्फे विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दांडी येथील महिला व विद्यार्थ्यींनी सोशल डिस्टसिंग पाळत कोरोना लढ्यासाठी आर्थिक मदत गोळा केली. चैतन्य गुड माँर्निंग, आस्था ग्रुप या सारख्या संस्थांनी गरीब व गरजूंना जेवणाची सोय केली. आस्था ग्रुपने अपना बाजार भरवून नागरिकांना माफक किमतीत भाज्या उपलब्ध करुन दिल्या. एकता मित्र मंडळ, धक्का मित्रमंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. बच्चे कंपनी, स्थानिक कलाकार यांनी वर्क फ्राँम अंतर्गत अनेक शाँर्ट फिल्म बनवून कोरोनाबाबत जनजार्गृतीचे महत्वाचे कार्य केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात या सर्वांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. पुढील अनेक वर्षे या सर्वांचे कार्य नेहमी स्मरणात राहिल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा