कोरोना अन् सामाजिक बांधिलकी..........
कोरोना कालावधीत लोकांवर अनेक बंधने आली. गेल्या तीन महिन्यात प्रत्येकाने आपले दैनंदिन जीवन पाहिले तर त्याचा प्रत्यय येईल. कोरोना कालावधीत सण, समारंभ, उत्सव या साऱ्यांवरच बंधने आली. परंतु या कालावधीतही काही व्यक्तींनी शासनाचे नियम पाळून सामाजिक बांधिलकी जोपासत सण, समारंभ, उत्सव साजरे केले. मालवण येथील कर सल्लागार महादेव पाटकर व कुडाळ येथील योगेश्री देसाई यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विवाहबद्ध झाले. उभयतांनी संविता आश्रमासाठी 700 लोकांच्या जेवणासाठी असलेले साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सूपूर्द केले. पाटकर दाम्पत्याचा हा उपक्रम अनेकांसाठी आदर्शवत आहे. हाती शस्त्र न घेता बुद्ध राज्य करी जगावर कारण प्रचार प्रभावशाली. या विधानाप्रमाणे दांडी येथील समित कोळगे व प्रज्ञा चोपडेकर उभायता कोरोनाविषयक जाणीव जागृती करुन विवाहबद्ध झाले. उभयता सोशल डिस्टसिंगने विवाहबद्ध झाली. या विवाहासाठी भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. दांडी येथील रश्मी खवणेकर, रसिका मांजरेकर यांनी कोरोना जनजागृतीची रांगोळी रेखाटून प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य केले. दोन्ही दाम्पत्यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा होता. महादेव पाटकर यांच्या उपक्रमातून आश्रमातील गरजूंसाठी असणारी कणव दिसते. तसेच कोळगे दामप्त्याला जनतेच्या आरोग्याविषयी काळजी वाटते. हे उपक्रम प्रत्येकाला सोपे वाटत असतील, पण ते राबवण्याची इच्छा, धैर्य या जोडप्यांनी दाखवल्याबद्दल ते निश्चित कौतुकास प्राप्त आहेत.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा