लाँकडाऊन आणि बबन.........
आमच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी बबन आणि त्याचे कुटुंबीय कर्नाटक विजापूर येथून रहायला आले होते. बबन त्याची पत्नी दोन लहान मुले यांच्यासह भाड्याने राहत होता. बबनचे खरे नाव राम पवार , परंतु तो बबन चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसत असल्याने आम्ही त्याला बबन म्हणत असू. मालवण किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगमध्ये तो मदतनीस म्हणून काम करत होता. परंतु कोरोना आणि लाँकडाऊनमुळे दोन महिन्यापूर्वी त्याच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या दोन महिन्यात बबन या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु माझ्यासमोर उलघडले. बबनने त्याच्या गावात काही काळ एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. तो शिक्षणाचे महत्त्व जाणून होता. म्हणूनच त्याने आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते.परंतु दोन महिने बबनकडे रोजगार नसल्याने त्याची व कुटुंबियांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशा परिस्थितीत त्याला काय करावे हे सुचत नव्हते. काम मिळावे यासाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले परंतु लाँकडाऊनमुळे त्याला काम मिळेना. अखेर बबनला त्याच्या मूळ गावी जाण्यावाचून पर्याय नव्हता. परंतु गावी जावे की न जावे अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला होता. मुलांच्या शाळेच्या भवितव्याबाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तो वेळोवेळी आमच्या कुटुंबाशी, शेजाऱ्यांशी तो याबाबत चर्चा करायचा. पण चर्चेतून मार्ग निघत नव्हता. आणखी काळ लाँकडाऊन राहिले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होतो. अखेर त्याने विजापूरला जाण्याचा निर्णय घेतला. आपले सामान दुसऱ्या एका खोलीत ठेवून पुन्हा मालवणमध्ये येण्याच्या विचाराने तो विजापूरला जाण्यासाठी सज्ज झाला. चौघांच्या आरोग्य तपासणीनंतर तो श्रमिक रेल्वेने विजापूरला रवाना झाला. सध्या बबन आणि त्याचे कुटुंबीय विजापूर येथे क्वारटाईनमध्ये आहेत. बबन मालवणमध्ये परत येईल अशी आशा आहे. पण लाँकडाऊनमध्ये असे अनेक बबन आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत मूळ घरी परतले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रत्येक बबनच्या अशाच व्यथा असतील. कोरोना आणि लाँकडाऊने या साऱ्यांची एक प्रकारे परीक्षा पाहिली. आपला भारत देश श्रमिकांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे. कष्टकऱ्यांच्यां श्रमावरच हा भारत उभा आहे.परंतु कोरोना आणि लाँकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या देशातील असंख्य कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. रोजंदारीवर काम करणारा कामगार, मजूर या संकटांशी एकटा लढतोय. तो या संकटावर मात करेल. परंतु त्याला मदतीचा आधार देण्याची गरज आहे. शासनाने अशा रोजंदारीवरील कामगारांसाठी सुनियोजित कार्यक्रम बनविणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल.

लयभारी
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा