वसतीगृह चळवळीचे प्रणेते...राजर्षी शाहू महाराज...
आज राज्यात व देशात शासनाकडून वसतीगृहे उभारण्यात आली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेल्या जातींच्या मुलांसाठी ही वसतीगृहे कार्यरत आहेत. लोकशाही व्यवस्थेत मिळालेल्या मिळालेल्या हक्क आणि अधिकारानुसार आज प्रत्येक जण शिक्षण घेत आहे. परंतु 20 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत शिक्षण ही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची कवाडे बहुजन समाजाला खुली व्हावीत यासाठी आयुष्यभर छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. तत्कालीन परिस्थितीत बहुजन समाजाच्या मुलांची शिक्षणासाठी परवड होत असे. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसल्याने बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी शहरात यावे लागत असे. परंतु मोठ्या शहरात राहण्याची, जेवणाची त्यांची व्यवस्था होत नव्हती. ही बाब ध्यानात आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी 20 व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे 18 एप्रिल 1901 रोजी कोल्हापूर येथे व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग स्कूल या कोल्हापूरातील पहिल्या वसतीगृहाची स्थापना केली. या बोर्डींग स्कूलच्या नावात मराठा असा उल्लेख असला तरी वसतिगृहात मराठ्यांप्रमाणे मुसलमान, शिंपी, कोळी, माळी, गवळी या समाजातील मुलांना देखील वसतीगृहात राहण्याची सोय होती. शाहू महाराजांनी 1901 साली जैन बोर्डींगची स्थापना केली. याचबरोबरीने शाहू महाराजांनी लिंगायत, मुस्लीम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, चां.का. प्रभू, वैश्य, ढोर-चांभार, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, कोष्टी अशा विविध जाती धर्माची सुमारे 20 वसतीगृहे सुरु केली. शाहू महाराज वसतीगृहे स्थापन करत असताना वेगळी पद्धत अवलंबित असत. ज्या जातीचे वसतिगृह स्थापन करायचे आहे त्या जातीतील लोकांशी ते सातत्याने संपर्क करीत. आपल्या जातीतील मुलांच्या हितासाठी वसतिगृह आवश्यक आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करीत. त्यानंतर संबधित जातीमध्ये वसतीगृहाविषयी जाणीव जागृती होत असे. मग त्याच जातीतील एखादा पुढाऱ्याच्या पुढाकाराने वसतीगृहे स्थापन होत असत. शाहू महाराजांच्या या क्लुप्तीमुळे मागासवर्गीय जातीमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली. शाहू महाराजांनी जातवार वसतीगृहे निर्माण केली. जातवार वसतीगृहे निर्माण करण्याचा शाहू महाराजांचा उद्देश वेगळा होता. प्रत्येक जातीतील मुलांनी शिक्षण घेतले तर ते विचारशील बनतील. मुले विचारशील बनल्यावर जातीयता व अस्पृश्यता ही वाईट आहे हे आपोआप त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ही मुले प्रयत्न करतील. असा शाहू महाराजांचा त्यामागील हेतू होता. शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतीगृहांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुले शहरासारख्या भागात जाऊन शिक्षण घेऊ लागली. स्वतः च्या पायावर उभी राहू लागली. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात वसतीगृहाची चळवळ सुरु केली नसती तर अनेक बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहिली असती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बहुजन समाजातील मुलांसाठी वसतीगृहाची चळवळ निर्माण करणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्यास त्रिवार अभिवादन!
संग्राम सतीश कासले, मालवण.
(संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य - डाँ. जयसिंगराव पवार)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा