परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी........
बार्टीच्या समतादूत प्रकल्पामुळे मी परिवर्तनवादी चळवळीशी जोडला गेलो. समतादूत प्रकल्पात काम करत असताना सिंधुदुर्गातील विजय कदम व सगुण जाधव या दोन परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी माझी ओळख झाली. कासार्डे येथील विजय कदम हे चळवळीतील निर्भिड कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून ते समताप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडायचा हा त्यांचा स्वभाव आहे. तथागत गौतम बुद्ध, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावरील साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. चळवळीतील तरुण कार्यकत्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. चळवळीतील दुसरे सहकारी सावंतवाडी येथील सगुण जाधव. सगुण हा देखील अनेक वर्षे जिल्ह्यात समताप्रबोधनाचे काम करत आहे. सगुणने महाराष्ट्र व गोवा राज्यात अनेक ठिकाणी समताप्रबोधनाचे कार्यक्रम केले आहेत. संत गाडगेबाबा ही व्यक्तीरेखा साकारुन अनेक ठिकाणी समताप्रबोधन करुन सगुणने लोकांची मने जिंकली आहेत. विजय आणि सगुण यांनी आपल्या व्यक्तीगत जीवनात समताप्रबोधनाला महत्वाचे स्थान दिले आहे. समताप्रबोधन एका व्यक्तीलाही करता येते अन् हजारो व्यक्तींना हे सूत्र मी दोघांकडून शिकलो. विजय आणि सगुण दोघेही ज्या ठिकाणी वेळेची उपलब्धता असेल त्या ठिकाणी समताप्रबोधन करतात. विजय यांच्या प्रबोधनात मला कायम एक लढाऊबाणा दिसला आहे तर सगुणचे प्रबोधन शांत, सुंदर व सविस्तर विवेचन करणारे असते. दोघांच्या प्रबोधनाची पद्धत जरी वेगळी असली तरी त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने होतो.दोघांनीही समताप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवावे. दोघांनाही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा!
(संग्राम कासले, मालवण)

सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवा