माझ्या आयुष्याची तीस वर्षे आज मी पूर्ण केली. तीस वर्षात पत्रकार, शिक्षक, समतादूत, कार्यक्रम आयोजक या भूमिका मी निभावल्या. बाकीच्यांना ही करीअर वाटत असतील पण माझ्या दृष्टीने या भूमिका आहेत. कारण नाटक, एकांकिकेत जसा एखादा अभिनेता आपली भूमिका अगोदरच्या भूमिकेप्रमाणे प्रभावी व्हावी यासाठी प्रयत्न करतो तसच करीअरच्या बाबतीत आहे. गेली तीस वर्षे माझा स्वप्नांचा पाठलाग सुरु आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय, मित्र परिवार, परिवर्तनवादी समाजसुधारकांचे विचार यांचा पाठिंबा मला सातत्याने मिळाला. तीस वर्षाच्या कालावधीत काही स्वप्ने पूर्ण झाली आहेत तर अनेक स्वप्ने अपूर्ण आहेत. बार्टीत मला खऱ्या अर्थाने बुद्धाची ओळख झाली. बुद्ध हा देवाचे अस्तित्व मानत नाही. मनुष्याचे जीवन दु:खाने भरलेलेले आहे. या दु:खावर मार्ग स्वतः च काढला पाहिजे असे बुद्धाचे तत्वज्ञान सांगते. याच तत्वज्ञानाप्रमाणेच मी माझ्या जीवनाची मार्गक्रमणा केली आहे. सुखात सर्वच आपले सोबती असतात पण दु:खात बुद्धाची शिकवणच आपल्या सोबत असते असे मला वाटते. बुद्धाच्या जीवनाचे मला सातत्याने कुतुहल वाटते. बुद्धाचे बहुतांश जीवन निसर्गात व्यतीत झाले. बुद्धाचा जन्म आणि महापरिनिर्वाणही निसर्गाच्या सानिध्यात झाले. माणूस दु:खमुक्त व्हावा यासाठी भगव चिवर परिधान करुन बुद्ध आपल्या भिक्कूंसमवेत भ्रमंती करीत असत. गृहत्यागानंतर बुद्ध अतिशय साधे जीवन जगले. असे जीवन कुणी अपवादानेच जगला असेल. बुद्धाने ज्या ठिकाणी भ्रमंती केली त्या ठिकाणी मला भेट द्यायची आहे. ते प्रत्येक ठिकाण पाहायच आहे ज्या ठिकाणी बुद्धाने दु:खमुक्त होण्याचा मार्ग सांगितला. माझ्या अपूर्ण स्वप्नांपैकी हे एक महत्वपूर्ण स्वप्न आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर ( स्वातंत्र्य, समता, बंधुत्व निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती) माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. या सर्वांनी शिक्षण या घटकाला महत्वपूर्ण मानले. शिक्षण व परिवर्तनवादी विचार प्रत्येकापर्यंत पोहचावे यासाठी माझा प्रयत्न असतात. हे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवणे हे माझे स्वप्न आहे. आम्ही ज्या पत्रकारिता क्षेत्रात वावरतो ते क्षेत्र नेहमी स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करते. त्यामुळे स्वतः ची वैयक्तिक अशी फारशी स्वप्ने नसतात. एखाद्या बातमीतून एखादी समस्या मांडली, त्या समस्येला न्याय मिळाला हेच आमचे स्वप्न असते जे सत्यात उतरलेले आम्ही पाहतो. संघर्ष हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला संघर्षमय जीवन जगायला आवडत. जीवनाशी संघर्ष करताना मला सातत्याने सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रपरिवार, मार्गदर्शक यांचे मनापासून आभार. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी, सोशल मिडीयावरुन शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पुनश्च आभार! तुमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा मला माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायक आहेत. लवकरच नवीन बातमी, नवीन ब्लाँगसह भेटू.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा