निखिल गावकर आणि माझी मैत्री तिसरीपासूनची. भंडारी हायस्कुलमध्ये तिसरी ते दहावी या कालावधीत आम्ही एकत्र शिकलो. हायस्कूलमध्ये आम्ही माँनिटर, उपमाँनिटर जबाबदारी सांभाळयचो. त्यामुळे सात वर्षात आमची नावे कधीही फळ्यावर आली नाहीत.( वर्गात मस्ती करणाऱ्यांची नावे फळ्यावर लिहली जात). निखिल हा मच्छीमार कुटुंबातून आलेला आहे. परंतु निखिल शिक्षणाचे महत्व जाणून होता. म्हणून दहावीनंतर त्याने सायन्स करुन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अनेक ठिकाणी जाँब केले. अखेर त्याने घेतलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आणि तो लघुपाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला. निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. त्यामुळे शासकीय नोकरीत रुजू होण्यापर्यंत त्याला अनेक संकटांनाचा सामना करावा लागला. पण सर्व संकटाचा सामना करुन निखिलने आपले ध्येय्य प्राप्त केले. मित्रांच्या मदतीला धावून जाणे हा निखिलचा स्थायीभाव आहे. आमच्या बँचने व्हाँट्सअपवर माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला आहे. त्यामध्ये निखिलनेही पुढाकार घेत अनेक माजी विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये अँड केले. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेला एक ग्रीन बोर्ड भेट दिला आहे. निखिलने लहानपणापासून अनेक छंद जोपासले आहेत. नाटक, क्रिकेट हे निखिलचे आवडते छंद. मी आणि निखिलने भंडारी हायस्कूल मध्ये अनेक नाटके आणि नाटक एकत्र केली आहेत. निखिलच्या नाट्यवेडापायी मला तब्बल पाच वर्षाच्या ब्रेकनंतर स्पर्धेत उतरावे लागले. सावंतवाडी येथील मालवणी नाट्यस्पर्धेत आम्ही कुरुक्षेत्र सादर केली. या स्पर्धेत कुरुक्षेत्रला सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळाले. निखिल आणि निखिलच्या कुटुंबातील सदस्यांचा मित्र परिवार मोठा आहे. गणेशोत्सवाला हा मित्रपरिवार निखिलकडे आवर्जुन येतो. आम्ही शाळेत असताना दुपारच्या सुट्टीत सायकलने दरमजल करीत निखिलकडे गणेशोत्सव कालावधीत जेवायला जायचो. परंतु निखिलच्या आईच्या निधनानंतर मी निखिलकडे जेवायला गेल्याचे आठवत नाही. निखिलची आई हसऱ्या चेहऱ्याने आमचे स्वागत करायची. आग्रहाने जेवायला वाढायची. त्या जुन्या आठवणीने आता निखिलच्या घरी फारसे जाणे होत नाही. निखिल हा कठीण परिस्थितीही खंबीर राहुन निर्णय घेतो. परंतु आईच्या निधनावेळी मी निखिलला कोसळलेला पाहिला आहे. आईच्या निधनानंतर निखिल फारसा घरी थांबयचा नाही. मी त्याला विचारल तर घरी राहून आईची आठवण येत राहते याचा उल्लेख करायचा. पण हळूहळू निखिल आईच्या धक्क्यातून सावरत आहे. निखिलला नवनवीन गोष्ट शिकायची आणि शिकवायची आवड आहे. म्हणून तर शासकीय नोकरी सांभाळून निखिलने तीन अंकी नाटकात काम केले आहे. विविध क्रिडा स्पर्धांमध्ये तो सातत्याने सहभागी होत असतो. विजयी होणे याकडे निखिल फारसा लक्ष देत नाही. स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तो जीवनाचा आनंद घेत असतो. निखिल आज आपल्या कुटुंबाचा आधार बनलेला आहे. दोन्ही भावांचे करियर होण्यासाठी त्याचे बारकाईने लक्ष आहे. त्याबरोबर काकांच्या मुलांच्या करिअरबाबतही तो दक्ष असतो. माझ्या वैयक्तिक जीवनात निखिलने मला सातत्याने मार्गदर्शन केले आहे. कठीण काळात फक्त आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधारही दिला आहे. आम्ही कितीही दूर असलो तरी एकमेकांशी कनेक्ट असतो. मला वाटत तिसरीपासून सुरु झालेली दोस्ती कधीही तुटणार नाही. आज निखिलचा वाढदिवस. निखिलला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा