मुख्य सामग्रीवर वगळा

माझा वाचन प्रवास


वाचाल तर वाचाल असे एक सुवचन आहे. या सुवचनाने मला लहानपणापासून प्रेरित केले. पहिली ते पाचवी या कालावधीत मी जास्तकरुन गोष्टींची पुस्तके वाचली. सहावीपासून मी भंडारी हायस्कूलच्या ग्रंथालयात जाऊ लागलो. ग्रंथालयात मला वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके वाचायला मिळाली. सहावी ते दहावी या कालावधीत मी एकांकिका, पर्यावरण, विज्ञान या विषयावरची पुस्तके वाचली. अकरावी व बारावीत मी अनेक महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासली. त्याचबरोबर ऐतिहासिक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास केला. दोन वर्षात मी मृत्युंजय, राधेय, कौंतेय, राजा शिवछत्रपती, शुद्र पूर्वी कोण होते? आदि पुस्तके वाचली. या कालावधीत मी लोकमत या वृत्तपत्राचे सातत्याने वाचन करायचो. या वृत्तपत्रातील स्पर्धा परीक्षेसाठीची कात्रणे गोळा करुन मी त्याची एक वही बनवली होती. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच मी दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागलो. काँलेजच्या तीन वर्षांत माझे दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन वाढले. पण मी जिल्ह्यातील वृत्तपत्रे वाचन करत होतो. वृत्तपत्र वाचनाबरोबर अनेक मराठी कादंबऱ्यांचेही मी वाचन केले. वि.वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, नारायण धारप, वि. दा. करंदीकर, चि.त्र्यं.खानोलकर, बाबुराव बागुल, ह. मो. मराठे या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केले. काँलेजनंतर देवगडला बी.एडला असताना बी.एडच्या पुस्तकांव्यतीरिक्त फारसे वाचन झाले नाही. बीएडनंतर मळेवाड हायस्कूला असताना निबंधाच्या अनुषंगाने भरपूर अवांतर वाचन केले. या वाचनाचा उपयोग मला मराठी निबंधलेखन या पुस्तकाचे लेखन करताना झाला. समतादूत प्रकल्पाच्या निमित्ताने रायगडला असताना दत्ता गायकवाड या मित्रामुळे मला स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्याची आवड लागली. वर्षभरात दत्तामुळे मी स्पर्धा परीक्षेची भरपूर पुस्तके वाचली. समतादूत प्रकल्पात मला विविध विषयाची पुस्तके वाचायला मिळाली. समतादूत प्रकल्प प्रशिक्षणात आम्हाला समाजसुधारक, विचारवंत, वैज्ञानिक यांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली होती. या पुस्तकांमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची जवळून ओळख झाली. रायगडला असताना सकाळी लोकसत्ता पेपर मला लवकर वाचायला मिळायचा. वर्षभर लोकसत्ता मी सातत्याने वाचला. मालवणला दै. तरुण भारतमध्ये आल्यावर पुन्हा जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे माझे वाचन सुरू झाले. सध्या ई पेपरच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांचे वाचन सुरु असते. राज्यात विविध ठिकाणी फिरत असताना मला शक्य होतील तेवढी पुस्तके मी खरेदी केली. या पुस्तकांसाठी खास एक कपाट खरेदी केले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कपाटातील पुस्तके वाचत असतो. पुस्तक वाचनाने तुमची एक विचारधारा बनण्यास मदत होते. माझीही तशीच विचारधारा बनली आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मुल्ये माझी विचारधारा आहेत. या मूल्यांचा प्रसार करणे हे मी माझे कर्तव्य मानतो. तुम्हा सर्वांनाच माझे ग्रंथालय प्रत्यक्ष पाहता येणे शक्य नाही. त्यामुळे माझ्या ग्रंथलयाची माहिती देणारी युट्युबची लिंक मी शेअर करत आहे. ती अवश्य पहा. https://youtu.be/ucsQt6vrtTU

                                संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.