मालवणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली. गेले सव्वा दोन वर्षे मालवण पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सव्वा दोन वर्षात पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडून अनेक नवनवीन गोष्टी शिकता आल्या. क्राईमच्या बातम्यांसाठी आम्ही पत्रकार दररोज सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत मालवण पोलीस स्टेशन येथे असतो. त्यामुळे या कालावधीत आम्हाला चौधरी सरांकडून सातत्याने काहीतरी वेगळे शिकायला मिळायचे. सर मालवणात नव्याने रुजू झाले होते तेव्हा ते म्हणाले होते कि मला पोलीस स्टेशनचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. सरांचे ते विधान सव्वा दोन वर्षांनी खरे झाले आहे. सरांनी पोलीस स्टेशनमध्ये अनेक सकारात्मक बदल केले. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळत असे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकाचे काम लवकर झाले पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत रहावे लागता नये ही सरांची भूमिका होती. त्यामुळे सरांच्या या भूमिकेला अनुसरून मालवण पोलीस स्टेशनचे कामकाज व्हायचे. कोणताही नागरिक, ग्रामस्थ, तक्रारदार चौधरी सरांना भेटून आपल्या समस्या मांडायचा व सर त्या समस्यांचे निराकरण करायचे. चौधरी सरांकडे गेलेला गुन्ह्यांचा तपास सकारात्मक पद्धतीने लवकर व्हायचा. म्हणून अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचे तपास सरांकडे यायचे. सरांच्या मार्गदर्शनामुळे मालवण पोलीसांनी केलेल्या तपासामुळेच बनावट पास प्रकरणातील संशयित, महिलांची फसवणूक प्रकरणातील संशयित कारागृहाची हवा खात आहे. सरांकडे कायद्याचे सखोल ज्ञान आहे. हे ज्ञान ते स्वतः पुरतेच ठेवत नाही. त्यांच्या सोबत चर्चेला बसलेल्या प्रत्येकाला देतात. त्यामुळे सरांच्यासोबत चर्चेला बसणे म्हणजे कायद्याच्या सखोल ज्ञानाची पर्वणी असायची. क्राईमच्या बातम्या लवकरात लवकर मिळाव्यात असा आमचा पत्रकारांचा प्रयत्न असतो. चौधरी सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कालावधी आम्हाला क्राईमच्या बातम्या कोणतेही आढेवेढे न घेता लवकरात लवकर मिळायच्या. रोज सायंकाळी सरांकडून दिवसभरात घडलेल्या क्राईम बातम्यांची माहिती मिळायची. सरांची फिटनेस जबरदस्त आहे. रोज सकाळी सर माँर्निंग वाँकला जातात. बोर्डींग ग्राऊंडला सरांचा फेरफटका असतो. आम्ही बोर्डींग ग्राऊंडवर खेळायला जायचो तेव्हा सर माँर्निंग वाँकला यायचे. आमचा ग्राऊंडला राऊंड मारुन झालेला असायचा. पण सर आले की आपल्या सोबत एक राऊंड मारायला लावत. हा राऊंड मारतानाही सरांकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळायच्या. सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत सरांच्या प्रत्येक कामात मला परफेक्शन दिसून आले. कोरोना कालावधीत चौधरी सर व तहसीलदार अजय पाटणे सर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे मालवणात तीन महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. सर मालवणला येण्यापूर्वी रत्नागिरीला होते. आता सरांची बदली पुन्हा रत्नागिरी येथे झाली आहे. त्यामुळे सरांना पुन्हा रत्नागिरीत काम करण्याची संधी मिळाली आहे. सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

असे कर्तव्य दक्ष अधिकारी मिळणे हे मालवणकरांचे भाग्य. खरच करोना काळातील सरांच्या नियोजन वाखाण्याजोगे आहे. आम्ही कामानिमित्त जिल्हयात फिरत असताना मालवण तालुका आणि इतर तालुक्यात यातील फरक लगेच दिसायचा. आजही प्रत्येक नागरिक मास्क शिवाय बाहेर पडायला धजावत नाही हे सरांच्या शिस्तीचे यश.. त्यामुळेच या महामारीत मालवण सुरक्षित राहिले. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा .. पुन्हा संधी मिळाल्यास आपण बढतीने सिंधुदुर्गच्या पोलिस अधिक्षक पदी यावे हि सदिच्छा..धन्यवाद!
उत्तर द्याहटवा