राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगणाऱ्या मुली आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलींची प्रगती होण्यात त्यांचा कुटुंबाचा वाटा महत्वाचा असतो. कुटुंबातील सर्व घटकांनी मुलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे तरच मुली निर्धास्तपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करीअर करु शकतात असे प्रतिपादन केंद्रशाळा सुकळवाड नं १ च्या शिक्षिका विनया कदम यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा मालवण महिला विभाग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सुषमा हरकुळकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र जाधव, तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, सरचिटणीस रविकांत कदम, कोषाध्यक्ष संजय पेंडुरकर, प्रकाश पवार, मिलींद पवार, नचिकेत पवार, शंकर कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, माजी पंचायत समिती सदस्या सप्तशीला धामापुरकर, विलास वळंजु, प्रितम जाधव, करुणा चौकेकर, स्नेहा पेंडुरकर आदि उपस्थित होते.
यावेळी उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे यांनी उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजीत करण्यात येतात. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातुन स्त्रीया सक्षम होतात व स्वतःचा रोजगार निमार्ण करतात. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरात अनुसुचित जातीच्या सदस्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुषमा हरकुळकर यांनी महिलांनी विविध उपक्रमात सहभागी होउन स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आर्या कदम यांचा ती सावित्रीबाई फुले बोलतेय हा एकपात्री अभिनयाचा कार्यक्रम सादर केला. या प्रयोगाला उपस्थितांनी दाद दिली. सुत्रसंचालन विशाखा कदम यांनी केले. प्रांजल जाधव यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा